Pages

Wednesday, January 22, 2020

Adventure Camp Report


साहसी शिबिर अहवाल (मुंबई विद्यापीठाला सादर केलेला अहवाल)

(Adventure camp report)
            दि. ०५ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर २०१६ दरम्यान Atal Bihari Vajpayee Institute of mountaineering and Allied Sports, Regional Mountaineering Centre, धर्मशाला, हिमाचल प्रदेश येथे साहसी शिबिर (Adventure camp) घेण्यात आले. या शिबिरात मुंबई विद्यापीठाच्या १० स्वयंसेवकांचा (५ मुले व ५ मुली) संघ पाठविण्यात आला होता. या संघाचे नेतृत्त्व प्रा. राहूल पाटील (कार्यक्रम अधिकारी, कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, जव्हार, जि. पालघर) यांनी केले.

         दि. ०५ ऑक्टोबर रोजी केंद्राच्या संचालिका श्रीमती अवस्थी मॅडम यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. आपल्या छोटेखानी व्याख्यानातून पर्वतारोहन म्हणजे काय असते, त्यामुळे व्यक्ती निसर्गाशी जोडला जातो, जीवनातील संघर्षांना तोंड देण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण होते, असे प्रतिपादन त्यांनी केले. पहिल्या दिवशी आलेल्या स्वयंसेवकांची नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

         या शिबिरात मुंबई विद्यापीठाच्या संघाव्यतिरिक्त भारती विद्यापीठ, दक्षिण भारतातील आंध्रा विद्यापीठ व चेन्ना विद्यापीठाचे अनुक्रमे १०-१० स्वयंसेवक (प्रत्येकी ५ मुले व ५ मुली) व १ कार्यक्रम अधिकारी सहभागी झाले होते. म्हणजे एकूण ४० जणांची ही बॅच होती. 

        या दहा दिवसीय शिबिरात श्री. संदिप व श्री. सोमनाथ यांनी या ४० जणांच्या गटाला पर्वतारोहनाचे धडे दिले. दहा दिवसांच्या शिबिरात त्यांनी स्वयंसेवकांना दोरीला विविध प्रकारच्या गाठी मारणे, शारीरिक तंदुरूस्तीचे खेळ, नैसर्गिक डोंगर, कडा चढणे, उतरणे, कृत्रिम भिंतीवर चढणे, उतरणे, रात्री चालणे, दोरीच्या साह्याने नदी ओलांडणे (लिंक https://youtu.be/OcxmwRVj5m0), स्नॅक रेसिंग, पर्वतारोहन, तंबू गाडणे इ. चे धडे व्याख्यानांच्या व प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून दिले. पर्वतारोहन करताना कोणती काळजी घ्यायची असते, आरोग्याच्या समस्या या व इतर गोष्टींची माहिती त्यांनी स्वयंसेवकांना दिली.

        शिबिराच्या चौथ्या दिवशी पहिल्या शिबिरस्थळाहून ७ किमी अंतरावर असलेल्या घेरा या दुस-या शिबिरस्थळाकडे, सातव्या दिवशी तेथून ६ किमी अंतरावर असलेल्या हर्नाला या शिबिरस्थळाकडे तर आठव्या दिवशी हर्नालाहून १३ किमी अंतरावर असलेल्या करेरी सरोवरापर्यंत व तेथून परत असे एकाच दिवसात एकूण २६ किमी व ९ व्या दिवशी हर्नाल्याहून परत पहिल्या शिबिरस्थळापर्यंत १३ किमी असे ट्रेकिंग सर्व स्वयंसेवक व कार्यक्रम अधिकार्‍यांनी केले. यामुळे स्वयंसेवकांना आत्मविश्वास मिळाला, शारीरिक तंदुरूस्तीचे महत्त्व कळाले.

       दररोज सकाळी धावणे, वॉर्म अप, व्यायामाचे विविध प्रकार घेतले जात होते. जेणेकरून स्वयंसेवकांची शारीरिक क्षमता वाढेल आणि त्यांना पर्वतारोहण करणे सोपे जाईल व यादरम्यान येणार्‍या आव्हानांचा ते सहज सामना करू शकतील, हा उद्देश त्यामागे होता.

        दि. १४ ऑक्टोबर रोजी समारोपाचा कार्यक्रम झाला. यावेळी स्वयंसेवकांना अवस्थी मॅडम यांनी बॅच व प्रमाणपत्रे प्रदान केली. याप्रसंगी कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवकांनी आपल्या मनोगतातून सदर शिबिरातून आम्हाला व आमच्या स्वयंसेवकांना खूप शिकायला मिळाले व सदर शिबिर यशस्वी झाले, असे सांगितले. तसेच  अवस्थी मॅडम यांनी स्वयंसेवकांना संबोधित केले. या शिबिरात आपणास जे शिकायला मिळाले, त्याचा आपल्या जीवनात उपयोग करा, स्वत:चे सामर्थ्य वाढवा व देशालाही समर्थ व शक्तिशाली करा, निसर्गाला जपा, त्याच्या जवळ जा, पुन्हा शिबिराला या’, असे आवाहन त्यांनी केले. 

       दि.१४ ऑक्टोबर रोजी समारोप समारंभ संपल्यावर सर्वांनी साश्रू नयनांनी शिबिरस्थळाचा व एकमेकांचा निरोप घेतला.

      धन्यवाद!


प्रा. राहूल पाटील

कार्यक्रम अधिकारी,

संघप्रमुख

साहस शिबिर (Adventure Camp)

मुंबई विद्यापीठ, मुंबई.




















2 comments:

  1. आठवणीत पुन्हा रमलो

    ReplyDelete
  2. Each time we face our fear, we gain strength, courage, and confidence in the doing.

    ReplyDelete